‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात भक्तिरसाचा सोहळा; अश्वांच्या दौडीने रिंगण उजळले
पंढरपूरः संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस परिसरात भक्तीमय वातावरणात पार पडले. सकाळी ‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात रिंगण सोहळा संपन्न झाला.
माऊलींची पालखी रिंगण तळावर दाखल झाल्यानंतर सेवेकऱ्यांच्या खांद्यावरून सन्मानपूर्वक रिंगण स्थळी आणण्यात आली. त्यानंतर अश्वांना माऊलींच्या पादुकांवरील हार घालून बुक्का लावण्यात आला.
स्वाराचा अश्व व माऊलींचा अश्व रिंगणात चौफेर उधळत दौडले. त्या क्षणी जणू भक्तीचा झंकार आणि परब्रह्माची चाहुल रिंगणात उतरली होती, असा अनुभव वारकऱ्यांनी घेतला.
यानंतर मानाच्या दिंड्या रिंगणामध्ये दाखल झाल्या. उड्या, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात पावलांचा खेळ रंगला. टाळ-मृदंगाची जुगलबंदी आणि एकाच लयीत पडणाऱ्या पावलांचा ठेका पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.










