बचाव पथकाच्या तत्परतेने अनर्थ टळला
पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीत गस्त घालणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकाने आज ३ बुडणाऱ्या वारकऱ्यांना वाचवून अनर्थ टाळला. नांदेड जिल्ह्यातील श्री सुरज भारती गणेश भोकरे व सतीश भोकरे असे ३ वारकरी भाविक सकाळी चंद्रभागा नदीपात्रात ४ नंबर हायमास्ट पोलजवळ पोहताना अचानक दम लागल्याने पाण्यात बुडू लागले. नदीपात्रात गस्तीवर असलेल्या बचाव पथकातील जवानांनी तत्काळ पाण्यात उडी घेऊन वारकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर वारकऱ्याची प्रकृती स्थिर आहे.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची टीम वारी कालावधीत २४ तास चंद्रभागा नदीपात्रात गस्त व बचाव कार्यासाठी सज्ज आहे. नदीपात्रात १७ रेस्क्यू बोटी, १८० आपदा मित्र व प्रशिक्षित बचावकर्मी तैनात करण्यात आले आहेत. वारकऱ्यांनी नदीत उतरताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी केले आहे.









