मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन
पंढरपूर : “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दसूर पाटी येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेताना घातले. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे काही वेळ सारथ्यही केले. वारीत चालणारे सर्व वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप असल्याने वारीत चालण्याचा आनंद व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, माऊलीकडे एकच मागणं आहे ते म्हणजे सर्वत्र पाऊस चांगला पडू दे व शेतकरी बांधवांना सुखी समाधानी राहू दे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात मागील दोन वर्षांपासून पालखीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे यावर्षीच्या वारीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक येत असून मागील सर्व वाऱ्यांचा संख्यात्मक विक्रम तुटेल.

जिल्हा प्रशासनाकडून वारीमध्ये उत्तम सुविधा करण्यात आल्या आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची संख्या ही मोजली जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगले काम केले आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन घेण्याचा योग आला हे माझे मोठे भाग्य आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार अभिजीत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









