अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मागणी
सोलापूर : दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंचच्या वतीने गुरुवारी सोलापुरात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे ४०० वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत केंद्र व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सिव्हिल चौक, पांगळ हायस्कूल, जिल्हा परिषद पूनम गेट या प्रमुख मार्गावरून मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला. मोर्चाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततापूर्ण वातावरणात मोर्चा पार पडला.

मोर्चानंतर झालेल्या सभेत विविध वकिलांनी आपली भूमिका मांडली. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलनाचा अधिकार आणि कायद्याचे राज्य या मूल्यांचे संरक्षण करणे ही न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांचे मूलभूत हक्क अबाधित राहावेत आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी विधी मंच सातत्याने लढा देत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
______________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









