सोलापूर – केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकवर बंदी असल्याने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती तसेच विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे . नागरिकांनी याची नोंद घेऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले आहे.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा वापर करताना ध्वजसंहितेतील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. राष्ट्रध्वज रस्त्यावर अथवा अन्य ठिकाणी फेकून देऊ नये. राष्ट्रध्वज खराब झालेला किंवा वापरण्यायोग्य नसल्याचे आढळल्यास ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान अथवा विटंबना करणे हे बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५०, राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ तसेच ध्वजसंहितेतील तरतुदींनुसार दंडनीय अपराध आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करताना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून ध्वजसंहितेतील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले आहे.












