मंद्रूपकरांच्या जीवाशी खेळ? महिनाभरानंतर नळातून आले दुर्गंधीयुक्त ‘केमिकल पाणी’;
संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ओतले
मंद्रूप :- महिनाभराच्या तीव्र पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या मंद्रूपकरांना अखेर नळाव्दारे पाणीपुरवठा सुरू झाला; मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही. ग्रामपंचायतीकडून बुधवारी सोडण्यात आलेल्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून केमिकलसारखा वास येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनेकांनी हे पाणी घरात साठवण्याऐवजी थेट रस्त्यावर सोडून दिले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. गेल्या एक महिन्यापासून मंद्रूप गावावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढावले होते. जलवाहिनी फुटल्यानंतर ती वेळेत दुरुस्त करण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागली. गावातील अनेक विहिरी व बोअरवेलचे पाणीही कमी झाल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली होती.
पाणीटंचाईच्या वाढत्या तक्रारीनंतर दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत तसेच आमदार सुभाष देशमुख यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार टँकरचे पाणी गावातील पाणीटाकीजवळील संपात साठवून नळाव्दारे पुरवठा करण्यात आला. मात्र हेच पाणी घाण व दुर्गंधीयुक्त असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
बुधवारी सकाळपासून अनेक भागांत नळातून येणाऱ्या पाण्याला असह्य दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही नागरिकांनी तर पाण्यात केमिकलसारखा वास असल्याचा दावा केला. त्यामुळे महिनाभर पाण्याची वाट पाहणाऱ्या नागरिकांनीही हे पाणी वापरण्यास नकार देत ते थेट रस्त्यावर सोडून दिले. अनेक ठिकाणी नळाचे पाणी वाहून जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ग्रामपंचायतीने मोठा “गाजावाजा” करून टँकरची व्यवस्था केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना निकृष्ट दर्जाचे पाणी मिळाल्याचा आरोप होत आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी असताना दूषित पाणीपुरवठा करून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करण्यात आल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. 
दरम्यान, पाणीटंचाईच्या प्रश्नावर यापूर्वी ग्रामस्थांनी आंदोलन छेडत सरपंच व प्रशासनाला धारेवर धरले होते. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने टँकरची व्यवस्था केली; मात्र आता त्या पाण्याच्या गुणवत्तेवरच प्रश्न उपस्थित झाल्याने ग्रामस्थांचा रोष अधिकच वाढला आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावीद आवटे यांनी या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “महिनाभर पाण्यासाठी त्रास सहन केलेल्या नागरिकांना शेवटी दुर्गंधीयुक्त व संशयास्पद पाणी देणे हा गंभीर प्रकार असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना पाठीशी घालू नये,” असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेमुळे मंद्रूप ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दूषित पाण्याचा पुरवठा नेमका कसा झाला, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
._______________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*








