ग्रामसेवकांच्या ‘लेट-लतीफ’ कारभाराला चाप !
सोलापूर …
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा कडक सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी) यांची हजेरी आता अनिवार्यपणे GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच नोंदवण्यात यावी, असे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत सोलापूर जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या (ग्रामसेवक) हजेरीबाबत अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता जीपीएस (GPS) आणि बायोमेट्रिक (बोटांचे ठसे) प्रणालीद्वारेच उपस्थिती नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
शासनाने यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये ही प्रणाली राबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अनेक ग्रामपंचायतींमध्ये या नियमांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याच्या आणि अधिकारी वेळेवर उपलब्ध नसून नागरिकांची कामे रखडत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. याची गंभीर दखल घेत ग्राम विकास विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी नवीन परिपत्रक काढून सर्व जिल्हा परिषद सीईओंना योग्य ती कार्यवाही करण्याचे पुनश्च आदेश दिले आहेत.
आपल्या ग्रामपंचायतीत ही प्रणाली कार्यान्वित आहे की नाही, याकडे सर्व नागरिकांनी सतर्कतेने लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत अधिकारी गैरहजर असल्यास नागरीकांनी बीडीओकडे तक्रार करणे गरजेचे आहे. शासकीय कामाकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण व्हावे, यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी जागृत राहून नियमांची अंमलबजावणी न झाल्यास प्रशासनाकडे आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*











