दर्शनरांगेतूनच मिळणार दर्शन
प्रशासनाकडून व्हीआयपी कल्चरला पूर्णविराम
पंढरपूर :
१५ जुलैपासून पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नियम धाब्यावर बसवून कोणालाही व्हीआयपी दर्शन घडवून आणणाऱ्या संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्तिकयन एस. यांनी जारी केले आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापुढे मंदिरात “नो वशिला” म्हणजेच कोणत्याही प्रकारची शिफारस, व्हीआयपी पास किंवा विशेष प्रवेश बंद करण्यात आला आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सर्वसामान्य दर्शनरांगेतूनच जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. श्रीमंत-गरीब, मंत्री, आमदार , खासदार व सामान्य असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्याद्वारे २४ तास कडक देखरेख व विशेष भरारी पथकांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे .

गेल्या काही वर्षांपासून दर्शनासाठी “पास”, “शिफारस” आणि “स्पेशल एंट्री” यासाठी होणारी गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रांगेत तासन्तास उभ्या असणाऱ्या सामान्य भाविकांना आता दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने अलर्ट मोड घेतला आहे. नियम मोडणाऱ्या कोणावरही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
“पंढरीचा वारकरी हा समानतेचे प्रतीक आहे. इथे सर्वच भाविक विठ्ठलाचे लेकरू आहेत. त्यामुळे दर्शनाच्या बाबतीतही समानता असलीच पाहिजे.” या निर्णयाचे भाविक आणि वारकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नये. दर्शनासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. कोणताही दलाल आढळल्यास त्वरित प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आला आहे .
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









