टंचाईपेक्षा राजकारणालाच अधिक महत्त्व
सत्ताधारी व विरोधकांची ‘ तेरी भी चूप मेरी भी चूप ‘
दक्षिण सोलापूर :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांच्या संतापाचा बांध फुटू लागला आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्वसामान्यांना वणवण भटकावे लागत असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसल्याची टीका होत आहे. विद्युत पंपातील बिघाड, जलवाहिनी फुटणे आणि भीमा नदीतील पाण्याची कमतरता ही कारणे पुढे केली जात असली, तरी नागरिकांच्या मते ही कारणे आता नेहमीची झाली असून मूळ प्रश्न नियोजनाच्या अभावाचा आहे.
मंद्रूपसाठी तब्बल १४ कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली. याशिवाय टाकळी येथील जुनी जलवाहिनीही अस्तित्वात आहे. मात्र दोन – दोन योजना उपलब्ध असतानाही गावाला नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही गावाची तहान भागत नसेल, तर त्या योजनेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा होणे अपेक्षित असताना काही पदाधिकाऱ्यांचे लक्ष इतर प्रशासकीय घडामोडींमध्ये अधिक गुंतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे “पाण्यापेक्षा राजकारण महत्त्वाचे की नागरिकांचे हाल ?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर गावातील पाणीप्रश्नाला राजकीय रंग चढल्याची चर्चा सुरू आहे. पाणीपुरवठ्याच्या मूलभूत प्रश्नावर उपाययोजना करण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये वेळ जात असल्याचा आरोप होत आहे. परिणामी सामान्य नागरिक मात्र पाण्याच्या एका हंड्यासाठी भटकंती करण्यास मजबूर झाले आहेत.
विशेष म्हणजे ग्रामपंचायती तील सत्ताधारी आणि विरोधी गट या दोघांवरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पाणीटंचाई दूर करण्यात अपयशी ठरत असताना विरोधकांकडूनही प्रभावी पाठपुरावा होत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत “तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा गावभर रंगली आहे.
मंद्रूपची लोकसंख्या २५ हजारांहून अधिक असूनही महिनाभर पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला असून, तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी या प्रश्नात हस्तक्षेप करून मंद्रूपकरांची तहान भागविणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

…
चौकट
..
अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे नागरिकांना त्रास
…
“मंद्रूपला नवीन पाणीपुरवठा योजना सुरू होऊन एक वर्ष झाले. सरपंच व ग्रामसेवक यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे १४ कोटी रकमेची योजना सध्या फेल झाली असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची अकार्यक्षमता सिद्ध होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.”
– जावीद आवटे, तालुकाध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा, दक्षिण सोलापूर
…
चौकट
…
पाण्यावर राजकारण सुरू
…
“ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत गटाची सत्ता असताना टाकळीच्या जुन्या पाईपलाईन वरून मंद्रूपला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या १४ कोटींची नवीन जलवाहिनी व टाकळी येथील जलवाहिनी दोन्हीही योजना सुरू असताना ग्रामपंचायत प्रशासन पाणीटंचाई दूर करण्यात अपयशी ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभवाला मतदारांना दोष देणे चुकीचे आहे. मंद्रूप पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ग्रामपंचायतीने मागणी केल्यास पंचायत समितीकडे पाठपुरावा करू “
– मळसिद्ध मुगळे, पंचायत समिती सदस्य, मंद्रूप
….
ग्रामसेवक मागणीला जोर ?
…
स्थानिक ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांची तीन महिन्यापूर्वी बदली झाली आहे. कुशाबा इंगळे रजेवर गेल्याची संधी साधून ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकार्यांनी दक्षिणच्या बीडीओंकडे पुन्ही जोडमोटे यांची मागणी केली आहे. पाणीटंचाई दूर करण्या साठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याऐवजी पदाधिकारी ‘स्व’हित साधण्यासाठी पुन्हा ग्रामसेवक जोडमोटे यांची मागणीत मग्न असल्याने नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

….
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









