आत्महत्या शेवटचा पर्याय नाही
मंद्रूप…
खरंच तरूणाईमध्ये संघर्ष करण्याची क्षमता नाही की तरूणांना व्यक्त व्हायला आपलं वाटणारा या जगात कुणीच नाही, ज्याच्यासमोर मन हलकं करून मनातील विचार बाहेर काढाव. व्यक्त न झाल्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्या करणार्या तरूणांची संख्या वाढतेय. यामुळे त्यांच्या पश्चात मित्रांनी काय बोध घ्यावा. आत्महत्या केल्यामुळे प्रश्न सुटणार असतील तर आपल्याला नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवून व या जगात आल्यानंतर तुम्हाला कशाचाही त्रास होणार नाही याची काळजी घेणारे आईवडील त्यांच्या संघर्षमय जीवनात त्यांचं जीवन तेंव्हाच असत, तर या जगात जगणंच राहील नसतं म्हणून तरूणांनो, जीवन जगत असताना आपलं वाटणार्या जरूर व्यक्त व्हा. आपल्या इच्छापूर्तीसाठी आईवडीलांशी समजोता करून समाधानी जीवन जगा, हीच माफक अपेक्षा !
आज मंद्रूप सुन्न आहे आणि आमचं मन रडतंय. अभिजीत… हे नाव घेतलं की समोर उभा राहतो तो एक हसरा, जिद्दी आणि यशाची शिखरं सर करणारा तरुण उद्योजक. पण आज तुझा फोटो पाहताना डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. ज्या हातांनी उद्योगाचं साम्राज्य उभं करायला हवं होतं, त्याच हातांनी स्वतःच्या आयुष्याचा दोर कापून टाकला? का रे अभिजीत, इतकी घाई का केलीस?
तू व्यवसायात यशस्वी होत होतास, तुझं फ्रेंड सर्कल मोठं होतं, प्रत्येक वाढदिवसाला तू उत्साहाने स्टेटस ठेवायचास… मग इतकं सगळं असताना तुझ्या मनातल्या अंधाराची कुणकुण कोणालाच का लागली नाही? तू प्रत्येकाला आपलंसं करून बोलत होतास, मग तुला आपलंसं वाटणारं कोणीच नव्हतं का रे?
तुझ्या पश्चात तुझ्या त्या भोळ्या-भाबड्या आई-वडिलांची, भावाची आणि मामांची काय अवस्था होईल, याचा विचार एका क्षणासाठी तरी तुझ्या मनात का आला नाही? त्या माऊलीच्या काळजाची होणारी घालमेल तू कशी विसरलास?
‘Reel’ च्या जगात ‘Real’ संवाद हरवलाय!
मंद्रूपमध्ये घडलेली ही चौथी घटना आहे. ही केवळ आत्महत्या नाही, तर आपल्या समाजाचा कोसळलेला संवाद आहे. आपण तासनतास सोशल मीडियावर आहोत, पण शेजारी बसलेल्या माणसाच्या डोळ्यांतील पाणी आपल्याला दिसत नाही.
जुनाट व्हा,पण जिवंत राहा,आभासी जगाच्या ग्लॅमरपेक्षा आपलं ते जुनाट, साधं जीवन जगा जिथे माणसं एकमेकांच्या सुख-दुःखात फक्त ‘लाईक’ करत नाहीत, तर प्रत्यक्ष खांदा देतात.
मनात कितीही वेदना असो, आर्थिक संकट असो वा मानसिक खच्चीकरण— ते मनात साठवू नका. कोणासमोर तरी ढसाढसा रडून मन मोकळं करा. हुंदके देऊन मन हलकं करणं हे स्वतःला संपवण्यापेक्षा लाख पटीने चांगलं आहे.
तरुणांनो, जिद्दीने उभे राहा!
यशस्वी होण्यासाठी धडपड जरूर करा, पण अपयश आलं तर नाराज होऊ नका. आयुष्यात यशस्वी होण्यापेक्षा ‘चांगलं माणूस’ म्हणून जगण्याकडे लक्ष द्या. तुम्हाला बघून नैराश्यात असलेल्या माणसाला जगण्याची ऊर्जा मिळाली पाहिजे, असा तुमचा आदर्श असावा. कोणत्याही अनिष्ट शक्तीशी लढताना तुमची मानसिकता प्रबळ करा.
अभिजीत, तुझं जाणं हे आमच्यासाठी एक न भरून निघणारं दुःख आहे. पण तुझ्या या चुकीच्या पावलातून आजच्या तरुणाईने एकच शिकावं— संकटांशी लढा, पण स्वतःला संपवू नका. माणसांमध्ये फक्त शारीरिक नाही, तर मानसिक दृष्ट्या उपस्थित राहायला शिका.
शिवराज जगदेव कालदे.
मंद्रूप.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









