शिक्षक संघटनांकडून मागणी
सोलापूर… शिक्षक भरतीसाठीच्या पवित्र पोर्टलवरील पसंतीक्रम मर्यादेच्या नव्या अटींवरून राज्यभरात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. २ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारांतील सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होणार असले तरी, त्यापैकी लॉक करता येणाऱ्या पसंतीक्रमांवर मर्यादा घालण्यात आली आहे.
नवीन तरतुदीनुसार, मुलाखतीशिवायच्या निवडीसाठी उमेदवारांना जास्तीत जास्त १०० पसंतीक्रम लॉक करता येणार आहेत, तर मुलाखतीसहच्या प्रकारासाठी ही मर्यादा ५० इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र, ही अट अन्यायकारक व जाचक असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “१०० पसंतीक्रमांची अट तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे अमर्याद पसंतीक्रमाची सुविधा लागू करावी. अन्यथा कमी व मध्यम मेरिटधारक उमेदवारांचे मोठे नुकसान होईल,” अशी नाराजी
राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, अनेक ठिकाणी १०० जागांमधून केवळ १० उमेदवारांचीच मुलाखतीद्वारे निवड होत असल्याने उर्वरित उमेदवारांसाठी संधी मर्यादित होत आहे.
दरम्यान, १२ ते १७ मार्चदरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.
एकूणच, पवित्र पोर्टलवरील पसंतीक्रम मर्यादेच्या मुद्द्यावरून राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, सरकारने यावर लवकरात लवकर पुनर्विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













