आमदार सुभाष देशमुख यांचा भंडारकवठे गटात पदाधिकार्यांशी संवाद
भंडारकवठे…
भंडारकवठे जिल्हा परिषद गटातून अनुभवी व जनसामान्यांच्या समस्यांची जाणिव असणार्या सविता उंबरजे निवडणूक लढवित आहेत. पती महेंद्र उंबरजे उपअभियंता असताना या भागातील शेतकरी व नागरीकांना त्रासदायक ठरणार्या रस्ते, वीज व पाणी समस्या सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यामुळे भंडारकवठे गटातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी भाजपाच्या उमेदवार सविता उंबरजे निवडून देऊन इतिहास घडवा, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. ते भंडारकवठे गटातील औज, कारकल, लवंगी, सादेपूर बाळगी, टाकळी, निंबर्गी या गावासह इतर गावात पदाधिकार्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार देशमुख बोलत होते.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले की, भंडारकवठे जिल्हा परिषद गट हा भीमा नदीकाठी वसलेला भाग आहे. या भागात शेतकर्यांच्या वीजेसह, पाणीप्रश्न, रस्ता यासह इतर अनेक समस्रा आहेत. महेंद्र उंबरजे यांनी शासकीय सेवेत असताना नोकरीच्या माध्यमातून जनसेवेला प्राधान्य दिला आहे. उपअभियंता म्हणून काम करताना नदीकाठी शेतकर्यांना डोकेदुखी ठरणारी रस्ते चकाचक बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवाय भंडारकवठे गटातील सर्व गावातील सरपंच व पदाधिकार्यांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे सरकारी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. सुदैवाने भंडारकवठे गटात अनूसूचित जमाती प्रवर्गाचा आरक्षण पडल्यामुळे महेंद्र उंबरजे यांच्या पत्नी सविता उंबरजे यांना उमेदवारी मिळाली आहे. म्हणून मतदारांनी कोणताही विचार न करता विकासकामे मार्गी लावण्यासाठी व भंडारकलठेला माॅडेल बनविण्यासाठी भाजपाच्या उमेदवार सविता उंबरजे यांना निवडून देण्याचे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.









