दक्षिणमध्ये प्रथमच एका मंचावर बापू व मालकांची एंट्री
भंडारकवठे…
श्री सिध्देश्वर बाजार समिती व सोलापूर महानगरपालिका निवडणूकीनंतर सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख ‘बापू’ व सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख ‘मालक’ दक्षिणमध्ये प्रथमच एका स्टेजवर येऊन भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीरसभा घेणार आहेत. शहर उत्तर मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी विजय कुमार देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता स्वतःच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन शह दिला आहे. तर सोलापूर दक्षिण मध्ये माजी आमदार दिलीप माने यांनीही जुळे सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिल्यामुळे बापू गटात नाराजी आहे . शिवाय दक्षिण सोलापूरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत उमेदवारी देताना चुरस दिसून आली होती. माजी आमदार दिलीप माने यांनी सर्व ताकत लावून कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून दिली. मात्र शेवटच्या दिवशी आमदार देशमुख यांनी कार्यकर्त्यांसाठी पदाचा राजीनामा देण्याचा इशारा देत मालक गटातील उमेदवारी रद्द करण्यास भाग पाडले . माजी आमदार दिलीप माने मालक यांचा दक्षिण मधील वाढता हस्तक्षेप व मालकशाही रोखण्यासाठी दोन्ही देशमुख एकत्र आल्याची चर्चा सुरू आहे
त्यामुळे यावेळी ‘मालक’ व ‘बापू’ काय बोलणार ? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागला आहे.
दोन वर्षापूर्वीची मालक व बापू यांच्यामधील पक्षांतर्गत गटबाजी जिल्हावासियांना परिचित आहे. दोन्ही देशमुख मंत्री असताना सोलापूर पालकमंत्री पदावरून मोठ्या प्रमाणात कलगीतुरा रंगला होता . त्यानंतर २०२० च्या विधानसभा निवडणूकीत दोन्ही देशमुखांना मंत्रीपदाची ‘लाॅटरी’ लागण्याची शक्यता असताना दोन्हीकडून ‘लाॅबिंग’ झाल्यामुळे पाच वर्षात सोलापूरला मंत्री व पालकमंत्री पद मिळाले नाही.
२०२५ च्या निवडणूकीत पुन्हा विजय मिळविल्यानंतर दोन देशमुखांच्या वादात पुन्हा मंत्रीपदाने हुलकावणी दिली .
त्यामुळे ‘उपरा’ कारभार सुरू झाल्याने ‘दादा’गिरी कारभार सुरू झाला आहे. देशमुखांच्या विरोधातील नेत्यांना भाजपात प्रवेश देऊन आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर परीणाम होत आहे. कदाचित याची जाणिव झाल्यामुळे अथवा ‘देशमुख’शाहीवर गदा येत असल्यामुळे दोन्ही देशमुखांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोन नवख्या आमदार ‘दादा’नी देशमुखांच्या कारभारात हस्तक्षेप सुरू ठेवल्याने दोन्ही देशमुखांची एकजूट झाल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे महानगर पालिका निवडणूकीत भाजपाने घवघवीत यश मिळविल्यानंतर बापू व मालकांनी एकी दाखवित ग्रामिण भागातील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या विजयासाठी खटाटोप सुरू केला आहे.
मालक पालकमंत्री असताना कधीही त्यांनी दक्षिणच्या राजकारणात हस्तक्षेप केला नाही. दक्षिणचे कार्यकर्ते व भाजपा पदाधिकारी गेल्यानंतर बापूंकडे पाठवायचे. मात्र महानगरपालिका निवडणूकीत त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्याने देशमुखशाही दाखवित भाजपा पक्षासाठी एकी दाखविली. दोन देशमुखांमधिल कलगीतुरा व शीतयुध्दामुळे भाजपा कार्यकर्त्यांना अडचणी येत होत्या . मात्र आता मालक व बापू एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमधूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा परीषद निवडणूकीत बापूं बरोबर मालकही रणांगण गाजविणार असल्याने त्यांच्या जाहीरसभाकडे लक्ष लागला आहे. यावेळी माजी आमदार असणार्या ‘मालकशाही’वर बोलणार कि विकासकामांवर बोलणार ? हे पाहावे लागणार आहे.









