आमदार सुभाष देशमुख यांच्या पाणी सोडण्याच्या मागणीला जलसंपदा मंत्र्यांकडून होकार
सोलापूर.. एक महिन्यांपासून भीमा नदीतील पाणी संपल्यामुळे दक्षिण तालुक्यामधील १५ ते २० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. सादेपूर बंधारा येथे कर्नाटक सरकारकडून पाणी अडविण्यात आल्याने मंद्रूपसह अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. तर लवंगी, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर या गावातील नागरीक शेतकर्यांना पाणीटंचाईचा सामना करावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे पिके करपून चालली आहेत. तर पशूंच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणून दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करून पाणी सोडण्याची विनंती केल्यावर जलसंपदा मंत्र्यांनी त्वरीत पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.
उजनी धरण येथून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी दूरध्वनीवरून दिली. या सकारात्मक निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी नियमितपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती.
सततच्या पाठपुराव्यामुळे आज अखेर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय अमलात आला असून परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.









