मराठी भाषा समृध्द करण्यासाठी झपाटलेला डेप्युटी सिईओ मनोज राऊत
सोलापूर….
काटवट, बाशिंग, भानामती, कालवण, कोरड्यास, उतरंड मोटारकँड, दिस, वंगाळ, गावंढळ, कवतिक, चंग्गळ, टोणगा, केरसुनी, फणी, काकण, बोळ, मोरी, पैका, चारी,बेरकी, चिकाट, जोंदळं, यापार, ईदूळ ही शबुद बघून ईपरीत वाटलं ना. अशीच शब्द शोधण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी करमाळा तालुक्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यांनी यासाठी पाच हजार विद्यार्थी व आठशे शिक्षकांच्या मदतीने ग्रामीण भागात जाऊन वापरात नसलेली पण बोलीभाषेत वापरणारी शब्द शोधून काढली. यामुळे लयाला गेलेल्या शब्दांना पुनर्जीवन मिळाले असून त्यामुळे बोलीभाषेत आपलेपणा निर्माण होत आहे. हा उपदव्याप मांडण्याचे कारण म्हणजे आज मराठी भाषेच्या समृध्दीसाठी झटणार्या अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार , समीक्षक व मराठी साहीत्यातील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस . हा जन्मदिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी मनोज राऊत यांनी केलेल्या उपक्रमाची प्रचिती व्हावे, हा त्यामागील उद्देश्य आहे.
माझीया मराठीचिये
बोलु कवतिके,
अमृता तेही पैजा जिंके !
मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार व १३० पेक्षा अधिक कलाप्रकार आहेत. महाराष्र्टातील साडे तेरा कोटी लोक यासाठी मराठी भाषेचा वापर करतात.
मात्र बोली भाषेचा वेगळेपणा जपण्यासाठी आणि मराठीचं अस्तित्व टिकविण्यासाठी जुन्या विसरलेल्या शब्दांचा शोध घेणे या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे करमाळा तालुक्यातील जवळपास पाच हजार विद्यार्थी व साडेआठशे शिक्षक यांच्या सहभागातून ग्रामीण बोलीभाषा समृध्द करण्यासाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितिचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
बोली भाषेचा संग्रह करण्यासाठी प्रत्येक शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी गावांमध्ये फिरून ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, पालक महिला यांच्या भेटी घेऊन, मुलाखती घेऊन शब्द, जात्यावरच्या ओव्या, म्हणी, कोडी, हुमान इत्यादींची माहिती मिळवली. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाले, मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनीही नाविन्याचा आनंद घेतला. मुळातच भाषा ही संवादाचे माध्यम आहे. त्यामुळे जी आपली बोलीभाषा आहे , तीच आपण वापरली पाहिजे. तिच्याबद्दल लाज वाटू नये .कारण भाषा शुद्ध अशुद्ध असा प्रकारच नाही.
रोजच्या व्यवहारात बोली भाषेचा वापर केला. तर एका बाजूने मराठी अधिक श्रीमंत व समृद्ध होईल आणि दुसऱ्या बाजूने वारसाने मराठी असूनही मातृभाषा म्हणून इंग्रजीचा वापर करणाऱ्या नव्या पिढीला महाकवी ज्ञानेश्वरांनी गौरवलेल्या अमृतवाणीचा परिचय होऊन जाईल.
ग्रामीण बोली भाषेतील शब्द, म्हणी, जात्यावरील ओव्या आणि कोडी-हुमान असा विविध साहित्यांचा संग्रह होते. यामुळे वाचकांचे मनोरंजनही होईल आणि शब्दांच्या नेटक्या व नेमक्या वापराबद्दल मन आग्रही होईल. हे केवळ बोलीभाषेतील शब्द नाहीत तर आपल्याकडील सांस्कृतिक ठेवा आहे. काही वेळा शब्दांचा अपभ्रंश झालेला आढळून येतो. असे हे वैविध्यपूर्ण शब्द वाचताना वेगळीच भाषिक गंमत वाचकाला अनुभवायला मिळेल.
अशा अनेक ज्ञात अज्ञात बोलीभाषेतील शब्दांची अर्थपूर्ण उकल होते. तत्कालीन संस्कृती संदर्भ उलगडणारा मराठी बोली भाषेतील शब्दांचा खजिना उलगडतो .
अनेकदा नव्या पिढीला बोली भाषेतील शब्दांचा परिचय नसतो किंवा त्या शब्दांचा अर्थ माहित नसल्याने ते शब्द वापरले जात नाही .अशावेळी या शब्दांच्या नेटक्या वापरासाठी एक उत्तम उजळणीच निर्माण होते.
भाषा ही संवादाचे माध्यम आहे. आमची भाषा ही आमची भाषा. प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. तिची लाज वाटू नये. ग्रामीण लोकांची भाषा वाहणाऱ्या पाण्यासारखी असते. भाषेसोबत ग्रामीण माणसे जेवढी खेळतात तेवढी शहरी माणसे खेळत नाहीत हे सत्य नाकारता करता येत नाही. भाषा जितकी आत्मीयतेने बोलाल, नेहमीच्या व्यवहारात जितकी वापराल तितकी ती अधिक समृद्ध होत जाते.
मराठी बोलीभाषांमध्ये अनेक शब्दांचे भांडार दडले आहे. यातील काही शब्दांचा आजही आपण सर्रास वापर करतो. तर काही शब्द व्यवहारातून बाद झाले आहेत. जुन्या विसरलेल्या शब्दांचा शोध घेऊन बोलीभाषेचा दैनंदिन व्यवहारात वापर करणे आणि भारतीयांची अपूर्ण असलेली संस्कृती पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणे या महान ध्येयपूर्तीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे उपक्रम निश्चितच नव्या पिढीलाच नव्हे तर जुन्या पिढीलाही उपयुक्त वाटावा असा आहे.
माणसाची भाषा आणि त्याचा समाजातील, संस्कृतीमधील उच्च नीच दर्जा यांचा संबंध जोडला जाऊ नये.
जे ग्रामीण भाषा बोलतात त्यांची संस्कृती खालच्या दर्जाची ते लोक गावंढळ समजणे हेच मुळी चुकीचे आहे. बहुअर्थ वाहक बहुध्वनी सुचक बहु पदर असणारी गावभाषा समाजाच्या सांस्कृतिकरणाचे नानाविध पैलू स्पष्ट करणारी भाषा आहे. महत्वाचे म्हणजे बोलीभाषेची मजा आणि ओळख ही वेगळी आहे.
एका आगळ्यावेगळ्या उपक्रमातून ग्रामीण बोलीभाषेतील शब्द त्यांचे अर्थ म्हणी, कोडी हुमान, जात्यावरील ओव्या, गाणी यांचा तालुक्यातील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रत्येक गावामध्ये ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ पालक महिला यांच्या भेटी घेऊन, मुलाखती घेऊन केलेला शब्दसंग्रह निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना एका शब्दाचे अनेक अर्थ समजले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही आनंद वाटला.
विद्यार्थ्यांना ग्रामीण साहित्य वाचनाकडे वळवणे, ग्रामीण शब्दांचा म्हणींचा अर्थ बोध होणे, जीवन जगण्याची कला समजणे, आपल्या बोलीभाषेचे सौंदर्य वाढवणे, संस्कृतीचे जतन करणे. अशा अनेक उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी ग्रामीण बोलीभाषा हे निश्चितच प्रेरणादायी, मार्गदर्शक, उपयुक्त आहे.
इंग्रजी ही जगाची भाषा झाली आहे. ती शिकणे ही अपरिहार्यता झाली आहे. कारण ती जगाच्या संपर्काची भाषा आहे. पण त्याचसोबत आपण आपली भाषा टिकवणे देखील गरजेचे आहे. आपल्याला ठाउकच आहे दर बारा कोसावर भाषा बदलत असते. या भाषा आपल वैभव आहे. त्या त्या बोली भाषेतून एक संस्कृती आढळून येते.
आपल्या पिढीला आपल्या भाषेचा देखील इतिहास माहीत असायला हवा. या प्रकल्पाच्या माध्यमातून शाळा व गाव जोडताना त्यांनी वेगवेगळ्या पिढयाना एकत्रित आणला आहे. आपल्याकडे मराठी बोलीचे कोकणी मराठी, कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, असे अनेकविध प्रकार आहेत असे दिसून येते. भौगोलिक परिसरानुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी मराठवाडी, कोकणी, वन्हाड़ी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बागलाणी, नंदुरबारी, खातयोगी वरपांगी, ताप्तोगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलांचे आणखी उपप्रकार होतात. यासोबतच महाराष्ट्रात आदिवासी पोटभाषा म्हणून गोड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. ज्या पद्धतीने आपल्याला प्रमाण भाषा तिच्याबद्दल ज्ञान आणि माहिती असायला हवी त्याच पद्धतीने आपल्याला बोली भाषा, तिच्या वापरातील शब्द माहिती असणे गरजेचे आहे.
शालेय विद्यार्थ्यानी त्यांचे आजी आजोबा, गावातील ज्येष्ठ नागरिक यांना विचारून जो शब्द संचय केला आहे तो वाखणण्याजोगा आहे. आपण पाहतो की, समाजात वावरताना आणि व्यवहार करत असताना अनेक लोक शुद्ध भाषा वापरायची आग्रह धरतात. आपण तो आग्रह सोडून द्यायला हवा आणि भाषा संवर्धनासाठी सर्वसमावेशकतेच्या मार्गाने जायला हवे.
डेप्युटी सिईओ मनोज राऊत यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी राबवलेला हा प्रकल्प शालेय स्तरावर राबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास नक्कीच बोली भाषेचा जतन व संवर्धन केले जाईल. पर्यायाने भाषा टिकण्यासाठी प्रयत्न होतील.

….,
चौकट
…..
करमाळा तालुक्यातील पाच हजार मुलांना गावात फिरून वडीलधाऱ्या व्यक्तींशी चर्चा करून मराठी भाषेतील ग्रामीण ढंगाचे शब्द शोधून आणण्याचा उपक्रम घेण्यात आला .काळाच्या ओघात बऱ्याच वस्तू,बऱ्याच रूढी या व्यपगत होतात आणि त्या संदर्भाने येणारे शब्द सुद्धा नष्ट होतात. उदा चूल नष्ट झाली की त्या अनुषंगाने येणारे सरपण, काटवठ, इस्तू,चूलवाण इ शब्द पण नष्ट होतात.असे शब्द नष्ट होऊ न देता येणाऱ्या पिढीला त्याची माहिती रहावी म्हणून केलेला हा प्रपंच. आपणसुद्धा असे नष्ट होणारे शब्द,म्हणी शोधून त्याची नोंद ठेवावी .
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा
मनोज राऊत , गटविकास अधिकारी , दक्षिण सोलापूर पंचायत समिती तथा
उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









