बंजारा समाजाच्या ‘धुंड’ची अनोखी परंपरा
सोलापूर..
‘धुंड’ साजरा करताना चक्क बंजारा महिलांकडून पुरुषांना काठीने मारण्याची प्रथा आजही तांड्यांमध्ये सुरू आहे. होळीच्या दुसर्या दिवशी धुलिवंदन साजरा करताना तांड्यांमध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेली ‘धुंड’ची परंपरा आजही दिसून येते. यामध्ये ‘खीर’चा हंडा काढताना महिलांकडून पुरूषांना काठीने मारण्यात येते आणि परंपरा म्हणून पुरूषमंडळीही आनंदाने काठीचा ‘प्रसाद’ म्हणून स्वीकार करून हंडा काढण्यात यशस्वी होतात. यामुळे वर्षभरातील एकमेकांच्या मनात असणारे राग, द्वेष, मत्सर व तिरस्कार या ‘धुंड’च्या निमित्ताने नष्ट होते.
….
धुंड म्हणजे काय ?
….
भटके समाज म्हणून ओळख असणार्या बंजारा समाजाकडून हजारो वर्षांपासून आजही रूढी व परंपरा जोपासण्यात येत आहे.
होळीच्या दिवशी नाईक व कारभारीसह समाजबांधव गावातील ‘प्रमुख’ (देशमुख) यांच्याकडून होळीसाठी गवर्या आणतात. यावेळी ‘लेंगी’ गीत म्हणण्यात येते. रात्री होळी पेटविल्यानंतर दुसर्या दिवशी धुलिवंदन साजरा करताना ‘धुंड’ला विशेष महत्व आहे. होळीच्या दुसर्या दिवसांपासून ते पुढच्या होळीपर्यंत जन्मलेल्या मुलांचा पाळणा (पाल) कार्यक्रम म्हणजे ‘धुंड’! यादिवशी सर्व समाजबांधव कोणताही भेदभाव न करता एकत्र येऊन धुंडचा आनंद लुटतात.
.,.
महिला करतात हंड्याचे रक्षण
….
धुंड साजरा करताना कारभारी व नाईक मुलगा जन्मलेल्या कुटुंबातून ‘खीर’ हंडा त्यांच्या घरासमोर ठेवतात. दोन रोवलेल्या काठीच्या सहायाने हंडा बांधला जातो. हा हंडा काढणे म्हणजे पुरूषांसाठी आवाहन असते. सर्व महिला या हंड्याचे रक्षण करण्यासाठी पुरूषांना काठीने मार देतात. यावेळी नवरा, मुलगा व नातेवाईक अशा प्रकार भेदभाव न करता हंडा काढणार्या प्रत्येक पुरूषाला महिला काठीने मारतात. यावेळी पुरूषमंडळीही मनात कोणताही राग, द्वेष व तिरस्कार न बाळगता काठीचा मार म्हणजे प्रसाद घेऊन हंडा उखडण्यासाठी आटापिटा करतात. एक ठिकाणी असलेला हंडा काढण्यासाठी दोन ते तीन तास लागतो. महिला , कारभारी व नाईक लेंगी गीत म्हणत हंड्याचे संरक्षण करतात. तर इतर पुरूषमंडळी हंड्यावर आक्रमण करून हंडा काढण्यात यशस्वी होतात.
…
‘पाल’ला विशेष महत्व
…
पुरूषमंडळींनी
हंडा काढल्यानंतर मुलगा जन्मलेल्या कुटुंबाकडे पाल मांडून व गोड जेवण करून सर्व समाजबांधव त्या मुलाला आशीर्वाद देतात. तसेच परमेश्वराकडे रोगराई व संकटापासून संरक्षण करण्याची विनंती करतात. यावेळी सर्व समाज एकत्र येऊन मुलगा जन्मलेल्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होतात.

…
या कुटुंबांनाच धुंड आयोजन करता येते
…
धुंड म्हणजे मुलाला पाळण्यात घालण्याचा अथवा नाव (पाल) ठेवण्याचा कार्यक्रम आहे.
चव्हाण, राठोड व जाधव या कुटुंबातील मुलांसाठीच धुंड कार्यक्रम असतो. इतर आडनाव असणार्या कुटुंबाला धुंड साजरा करता येत नसल्याचे प्रमुखांकडून सांगण्यात आले.
…,,

बंजारा समाजामध्ये होळी हा सण आजही अत्यंत उत्साह, श्रद्धा आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा जपत आलेल्या या समाजाची वेगळी ओळख आमच्या सण-उत्सवांतून स्पष्टपणे दिसून येते. होळी केवळ सण म्हणून नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचा आणि परंपरेचा उत्सव म्हणून साजरा करतो. गावागावांतून एकत्र येऊन लोक आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात.
मोतीलाल राठोड, संस्थापक अध्यक्ष, आरके फाउंडेशन मंद्रूप,
….

धुलीवंदन हा दिवस बंजारा समाजात ‘धुंड‘ म्हणून ओळखला जातो. या दिवशी विशेषतः गेल्या बारा महिन्यांत जन्मलेल्या मुलांवर संस्कार करण्याची प्रथा आहे. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी कुटुंबीय आणि समाज एकत्र येऊन विधी करतात. बाहेरगावी नोकरी व व्यवसायाच्या निमित्त असणारे चाकरमनी व अधिकारीही आनंदाने धुंड कार्यक्रमात सहभागी होतात.
मेजर तुकाराम राठोड, इन्कमटॅक्स आॅफीसर सोलापूर
….,
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*










