तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी बीज भांडवल योजना लागू
सोलापूर, दिनांक २४: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथीय घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासन निर्णय दिनांक १३ मार्च २०२६ नुसार “बीज भांडवल योजना” राज्यात राबविण्यात येणार असून, या योजनेत तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे..
योजनेत लाभार्थ्याचा ५% हिस्सा, शासनाचे ४५% अनुदान व ५०% बँक कर्ज अशा स्वरूपात मदत मिळणार आहे. लघु (₹२५,०००), मध्यम (₹५०,०००) व दीर्घ (₹२,००,०००) कर्ज सुविधा उपलब्ध असून भाजी स्टॉल, जनरल स्टोअर्स, बेकरी, ब्युटी पार्लर, मोबाइल दुरुस्ती यांसारख्या व्यवसायांसाठी सहाय्य दिले जाईल. याशिवाय कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणाचीही सोय करण्यात आली आहे.
पात्रतेसाठी अर्जदार महाराष्ट्रात किमान १० वर्षे वास्तव्य असणे, वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असणे, तसेच सक्षम प्राधिकरणाचे तृतीयपंथीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी निर्धारित नमुन्यात अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर कार्यालयात सादर करावा.
या योजनेतून तृतीयपंथीय घटकांना आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाची नवी दिशा मिळणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी सांगितले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*
.








