खा. ज्योती वाघमारे शेतकऱ्यांच्या बांधावर;
तातडीने पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना
सोलापूर,…
जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी आज नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. “सरकार आणि लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत,” असा शब्द देत खासदार डॉ. वाघमारे यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिला.
येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. द्राक्ष बागा, केळी, आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी गोठे आणि घरांचीही पडझड झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. वाघमारे यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मोहोळ तालुक्यातील या नैसर्गिक आपत्तीची माहिती देत त्यांनी शासनाकडून तातडीने मदतीची मागणी केली आहे. तसेच उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या.
….,

“शेतकऱ्यांचे नुकसान पाहून मन हेलावले आहे. केवळ पंचनामे करून न थांबता, नुकसानभरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात पडेपर्यंत पाठपुरावा करेन. उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच दिलासादायक निर्णय होईल.”
— डॉ. ज्योतीताई वाघमारे (राज्यसभा खासदार)
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









