अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक
अंतरवाली सराटी :
मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत 30 मेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. “मंडपात नाही, तर भर रणरणत्या उन्हात उपोषण करणार… मेलो तर मेलो पण आता मागे हटणार नाही,” असा थेट इशाराच त्यांनी सरकारला दिला.
“कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच आहेत. सरकारला फक्त मराठ्यांची मते पाहिजेत, पण आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घ्यायची वेळ आली की टाळाटाळ केली जाते,” असा आरोप त्यांनी केला.
“सरकारने वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी केली नाही,” अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले कि, “आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांचे विरोधक नाही. त्यांनी शंभर टक्के आरक्षण देऊ असे सांगून समाजात अपेक्षा निर्माण केल्या. अजूनही त्यांच्याकडे मराठा समाजाची मनं जिंकण्याची संधी आहे. त्यांनी सर्व मागण्या मान्य करून निर्णय घ्यावा. मराठा समाज हा लढणारा आणि साम्राज्य उभं करणारा समाज आहे. केवळ आश्वासनांवर आता समाज थांबणार नाही. चर्चा खूप झाल्या, आता निर्णय हवा,” असे सांगत त्यांनी सरकारवर दबाव वाढवला.
30 मेपासून सुरू होणारे उपोषण अत्यंत टोकाचे असेल, असे स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी कोणत्याही मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत गर्दी करू नये, असे आवाहन केले. “मी समाजासाठी प्रामाणिकपणे लढतोय. उष्माघाताने माझा बळी गेला तरी मी मागे हटणार नाही,” असा भावनिक निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
“आता फोनवरून कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही चर्चेला कधीच नकार दिला नाही. सरकारलाच उत्तर द्यायला जागा उरलेली नाही. आम्ही अल्टिमेटम दिला होता, पण मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आता 30 मेपासून उपोषण अटळ आहे,” असे ते म्हणाले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









