उद्यापासुन सुरू होणार निवडणूकीचा ‘कार्यक्रम’
सोलापूर…
१६ जानेवारीपासून जिल्हा परिषद पंचायत व समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्यामुळे व आयाराम गायरामांची संख्या वाढल्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत महानगरपालिकांसारखे अयाराम गयारामान संधी दिल्यास पक्षाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवार १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे . मात्र अद्याप कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आले नाही. दक्षिणमध्ये सहा जिल्हा परीषद गट व १२ पंचायत समिती गण असल्यामुळे ‘बापू’ ‘दादा’ व ‘मालक’ यांच्यामध्ये दोन दोन जिल्हा परिषद गट सोपविण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. आठ वर्षानंतर निवडणुका होत असल्यामुळे सर्वच पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यास दगा फटका होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वच पक्षाकडून सावधगिरी बाळगून उमेदवारी जाहीर करण्यास प्राधान्य देणार आहे. सोलापूर महानगरपालिकेत ऐनवेळी इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे मतदार व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी दिसून आली. उमेदवारीची खिचडी पहायला मिळाली. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये इतर पक्षातून आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्यास ‘निष्ठावंत’ व ‘सच्चा’ कार्यकर्त्यांमधून विरोध होणार असल्याचे सांगण्यात येते . त्यामुळे महानगरपालिका निवडणूक पॅटर्न राबविल्यास सर्वच पक्षांना कार्यकर्त्यांकडून फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर पक्षातून सत्ताधारी पक्षात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यापूर्वी पक्ष तळागाळात पोहोचविलेल्या लोकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. त्यामुळे त्या लोकांमध्ये इच्छा असताना पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीतील भूमिकेकडे लक्ष राहणार आहे. एकूणच सोलापूर महानगरपालिकेतील सर्वच पक्षातील अयाराम गयरामांची संख्या पाहता व कोलांटवड्या पाहता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये इतर पक्षातून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या लोकांना संधी दिल्यास नेत्यांचे शब्द ‘प्रमाण’ म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात ‘इन्कमिंग‘ सुरू असल्यामुळे या पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या लोकांची उमेदवारी अद्याप जाहीर
नसल्यामुळे त्या लोकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी न मिळाल्यास दक्षिणमध्ये पक्षाविरुद्ध बंड करण्याची तयारी सुरू झाली आहे.








