दक्षिणमध्ये राजकीय वातावणर तापले
दक्षिण सोलापूर….
मंगळवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११४ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने व १८ जागांसाठी ८० उमेदवार रींगणात असल्याने दक्षिणमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा अंतिम चित्र स्पष्ट झाली आहे. त्यामुळे एकमेकांचे राजकीय स्पर्धक व विरोधक आमनेसामने आले असून ‘किस मे कितना है दम’ म्हणत निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. यामुळे ‘अस्तित्व’ आणि ‘प्रतिष्ठा’ सिध्द होणार असून कोण ‘बाजीगर’ ठरणार ? हे ७ फेब्रुवारीला सिध्द होणार आहे.
दक्षिणमध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात तीन जिल्हा परिषद गट व पाच पंचायत समिती गण तर सोलापूर दक्षिण मतदारसंघात तीन जिल्हा परिषद गट व सात पंचायत समिती गणामध्ये विभागणी झाली आहे. यामध्ये दक्षिणमध्ये ‘बापू’ तर अक्कलकोटमध्ये ‘दादां’नी कार्यकर्त्यांना ‘आपल्या’ संधी दिली आहे. त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सर्वाधिक लक्ष वेधलेल्या हत्तूर गटातून भाजपाच्या उज्वला हविनाळे व शिवसेनेच्या लक्ष्मीताई पाटील यांच्यातील लढत रंगतदार होणार आहे. गत निवडणूकीत भाजपाचे डाॅ. चनगोंडा हविनाळे व शिवसेनेचे अमर पाटील यांच्यातील लढतीत अमर पाटील यांनी बाजी मारली होती. नऊ वर्षानंतर पुन्हा हविनाळे व पाटील परीवार आमनेसामने आली आहेत. त्यामुळे ही निवडणूक डाॅ. हविनाळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची ठरणार आहे.
भंडारकवठे जिल्हा परिषद गट अनूसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने याठिकाणी जात प्रमाणपत्र वैद्यतेमुळे उमेदवारांची संख्या कमी आहे. मात्र या गटात निवृत्त उपअभियंता महेंद्र उंबरजे यांच्या पत्नी सविता उंबरजे व निवृत्त शिक्षक अमोगसिध्द कमळे यांची कन्या रूपादेवी कमळे यांच्यामध्ये सामना होत आहे. शिवाय शिवसेनेच्या जयश्री संगोळगी व राष्र्टवादीच्या कांचन खडाखडे यांचा कोणाला फटका बसणार? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
मंद्रूप जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपाच्या सोनाली कडते , राष्र्टवादीच्या प्रिती कोरे, काॅंग्रेसच्या सनाकौसर शेख व प्रियांका बरूरे यांच्यामध्ये लढत होत आहे. याठिकाणी माजी सभापती सोनाली कडते व माजी जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे यांच्या कन्या प्रिती कोरे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागली आहे. तसेच काॅंग्रेसचे सचिव महमद शेख यांनीही कंबर कसली असूस पत्नी सनाकौसर यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे त्यांचा फटका कोणाला बसणार ? हे निकालानंतर दिसणार आहे.
दक्षिणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी देताना आमदार सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने यांच्यामधील गटबाजी उफाळुन आली होती. यामध्ये आमदार देशमुख गटाने बाजी मारली असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र माजी आमदार दिलीप माने गटाचे कार्यकर्ते प्रचारात अद्याप सक्रीय नसल्याने निकालाविषयी उत्सुकता लागली आहे. 











