मरीआई समाजाच्या विकासासाठी प्रशांत कडते यांची सिईओ जैन यांच्याशी चर्चा
सोलापूर…
पिढ्यानपिढ्या पोटाची खळगी भरण्यासाठी डोक्यावर मरीआईची मूर्ती, टोपली आणि गळ्यात डमरू घेऊन ‘टरबूर… टुटबूर… टरबूर… टुटबूर…’ असा आवाज करत भटकंती करणाऱ्या मरीआई समाजाच्या व्यथा , अडचणी व समस्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी मंद्रुप जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कडते यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर झेडपीचे सिईओ कुशल जैन यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दररोज पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणार्या मरीआईवाले समाजाच्या महिलांना डोक्यावर मरीआईची टोपली पाहून झेडपीचे पदाधिकारी व अधिकारी आश्चर्यचकीत झाले. मात्र शासनाच्या अनेक योजना या समाजासाठी असताना पिढ्यान् पिढ्या हा समाज विकासापासून वंचित आहे. म्हणून फ्रशांत कडते यांनी निवडणूकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी सिईओ जैन यांची भेट घेऊन विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. त्यामुळे या समाजाला खऱ्या अर्थाने मदतीचा हात मिळताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप येथील इंदिरानगर (मडीवस्ती) आणि संजयनगर परिसरात राहणाऱ्या या समाजाची अवस्था अत्यंत दयनीय असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अण्णा कडते यांनी पुढाकार घेतला आहे.
आजवर मंद्रूपने अनेक नेते, जिल्हा परिषद सदस्य , सभापती हे निवडणुका आल्या की या वस्त्यांमध्ये यायचे. आणि आश्वासन देऊन निघून जायचे. त्यामुळे केवळ ‘व्होट बँक’ म्हणून या समाजाचा वापर झाला. पण मतदानानंतर या समाजाच्या ताटात काय पडलं? गरिबी, अज्ञान आणि उपेक्षा . आपल्या लेकरा बाळांच्या हातात पाटी-पेन्सिल देण्याऐवजी, परिस्थितीने त्यांच्या हातात आजही देवीची टोपली आणि डमरूच दिला आहे . शिक्षणाचं प्रमाण शून्य आणि जगण्याची भ्रांत कायम, अशा दयनीय अवस्थेत हा समाज आज आपला जीव मुठीत घेऊन जगत आहे.
जिल्हा परिषद सदस्य सोनाली कडते यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कडते यांच्या नेतृत्वाखाली मरीआई समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांची भेट घेतली. मंद्रूप इंदिरानगर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या आणि समाजाशी आपुलकीचे नाते जडलेल्या आरोग्य सेविका वैशाली जगताप यांची बदली रद्द करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली. या समाजासाठी शासनाच्या विशेष विकास योजना राबवून त्यांना हक्काचे घरकुल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे , यासारख्या अनेक प्रकारच्या मागण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी
सामाजिक कार्यकर्ते असलेल्या प्रशांत अण्णांनी या समाजाचा हात केवळ मतांसाठी नाही, तर त्यांच्या प्रगतीसाठी धरला आहे.भटक्या विमुक्त जातीसाठी विशेष योजना राबवणे, मुलांना शाळेत पाठवणे आणि या समाजाला ‘भिकेच्या’ नव्हे तर ‘हक्काच्या’ रोजगारापर्यंत नेणे, हा लढा आता सुरू झाला आहे. सिईओंनीही मरीआईवाले समाजाच्या विकासासाठी विशेष योजना पोहोचविण्याची ग्वाही दिली.
यावेळी प्रशांत कडते, सिद्धलींग म्हेत्रे, किसन मरीआईवाले, संजय मरीआईवाले, आजाराम मरीआईवाले, तायप्पा मरीआईवाले यांच्यासह समाजातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
********************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294









