पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीतून वगळू नये
– मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम
जिल्ह्यातील 39 लाख 46 हजार 781 मतदारांपैकी 32 लाख 83 हजार 811 मतदारांचे मॅपिंग पूर्ण
सोलापूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यातही मतदार यादींच्या अचूकतेसाठी विशेष सखोल पुनरिक्षण SIR कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, चुकीची नोंद दुरुस्त करणे तसेच अपात्र नावे वगळणे असा आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांनी कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात चोक्कलिंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, यांच्या सह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम पुढे म्हणाले की, या अंतर्गत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) घर भेटी मध्ये नागरिकांना गणना फॉर्म दिल्यानंतर तो त्यांच्याकडून लगेच भरून घ्यावा. नागरिकांनी सोबत आवश्यक पुरावे दिल्यास तेही घ्यावेत. मतदार यादीतील नावात विसंगती असेल तसेच अविवाहित मतदार असतील अशा ठिकाणी डॉक्युमेंट आवश्यक आहेत. मतदार अधिकाऱ्यांनी बीएलओ व सुपरवायझर यांचे व्यवस्थित प्रशिक्षण घ्यावे . अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांचे मतदार यादीत नोंद करून घ्या. तसेच ज्या ठिकाणी मॅपिंग कमी झाले आहे अशा ठिकाणी लक्ष ठेवावे व त्या ठिकाणी कामाची गती वाढवा, अशा सूचना श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कार्तीकेयन
म्हणाले, जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची संख्या 11असून लोकसभा मतदारसंघ 2 आहेत (सोलापूर (SC) व माढा). एकूण मतदारसंख्या 39 लाख 46 हजार 781 असून त्यात पुरुष वीस लाख दहा हजार 948, महिला 19 लाख पस्तीस हजार पाचशे पाच व इतर 328 मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 3723 मतदान केंद्रे कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 77 हजार 86 ब्लर फोटो व चुकीच्या नोंदी प्रकरणांपैकी 72 हजार 648 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्याच्या एकूण मतदार संख्येच्या 32 लाख 83 हजार 811 मतदारांचे सखोल पुनरीक्षण झालेले आहे. सरासरी प्रमाण 83.20% इतके आहे.ग्रामीण भागात नोंदणी टक्केवारी 87.20% असून शहरी भागात 72.67% आहे. ग्रामीण भागात BLO व सहाय्यक अधिकाऱ्यांनी समाधानकारक कामगिरी केली असून शहरी भागात अधिक लक्ष देऊन हे प्रमाणही वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









