काडादी, कोगनुरे, पवार ,वैद्य व मिस्त्री जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीपासून अलिप्त
सोलापूर ..
दक्षिण विधानसभा मतदारसंघात २०२५ च्या निवडणुकीदरम्यान दक्षिण मधील अनेक दिग्गज नेत्यांनी नशीब आजमावले. यावेळी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनवरे, मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार , स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे सोमेश वैद्य, रूग्णसेवक बाबा मिस्त्री तसेच सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करून भाजपच्या उमेदवाराला आव्हान दिले . २०१७ नंतर नऊ वर्षांनी व विधानसभा निवडणूकीनंतर एका वर्षांनी दक्षिणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होत असून यावेळी मात्र दिग्गज नेते निवडणुकीपासून अलिप्त असलेले दिसून येतात. विधानसभा निवडणुकीत नेत्यांचा झेंडा घेऊन प्रचार करणारे कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नशीब आजमावत असताना नेते मात्र प्रचारापासून अलिप्त असल्यामुळे कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
महादेव कोगनूरे हे एम के फाउंडेशनच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले होते जळीतग्रस्तापासून निराधारांना भोजन व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यापर्यंत त्यांचे कार्य कौतुकास्पद होते . त्यांनी भाजपमधून उमेदवारी मागितली मात्र . त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी ऐनवेळी मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविले. मात्र यावेळी त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचा अपेक्षा भंग झाला. सामाजिक कार्यात केलेल्या कामाची पोहोचपावती न मिळाल्यामुळे त्यांनी राजकारण सोडून व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवून घेतला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही त्यांचा सहभाग दिसला नाही . १६ जानेवारीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवीत आहेत . अशावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणुकीत सहभाग होणे गरजेचे आहे . मात्र सध्या ते व्यवसायात व्यस्त असल्यामुळे प्रचारामध्ये दिसणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनीही विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी मिळवून दहा हजाराहून अधिक मते मिळविले. त्यांनी सामाजिक कार्य केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या बळावर आमदार होण्याची स्वप्न पाहिले. मात्र भाजपच्या लाटेत त्यांचाही निभाव लागला नाही. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांनी ‘ व्हाईट हाऊस’ येथील मार्ग फाउंडेशनचा कार्यालय बंद करून पुणे येथे रियल इस्टेट मध्ये स्वतःला व्यस्त ठेवला आहे. अद्याप पर्यंत त्यांनी निवडणुका संदर्भात कोणतीही भूमिका जाहीर न केल्यामुळे ते निवडणुकीपासून अलिप्त राहणार असल्याचे दिसून येते.
सिद्धेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी ऐनवेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत उमेदवारी दाखल करून निवडणूक लढविली . महाविकास आघाडीतील दुफळीमुळे त्यांनाही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांची ही घोर निराशा झाली .म्हणून त्यांनी एक वर्षापासून कोणत्याही राजकीय व सामाजिक कार्यात सहभाग नोंदविल्याचे दिसून येत नाही . मात्र त्यांचे अनेक समर्थक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त लढवत असल्यामुळे काडादी यांनी प्रचारात सक्रीय होण्याची आवश्यकता आहे .
स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाईंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमेश वैद्य यांनी विधानसभा निवडणूकीत मोठी रंगत आणली होती. मात्र भाजपच्या लाटेत त्यांचाही निभाव लागला नाही. त्यामुळे तेही सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अलिप्त असल्याचे दिसून येत आहे.
रूग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी दोनवेळा दक्षिणमध्ये विधानसभा निवडणुक लढविली. मात्र दोनही वेळा त्यांचा पराभव झाल्याने ते रूग्णसेवेत स्वताला वाहून घेतले आहेत. वर्षभरात दक्षिणमध्ये त्यांचा संपर्क दिसुन येत नाही.

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दक्षिण विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावलेले अनेक दिग्गज निवडणुकीत अलिप्त असल्यामुळे कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी निवडणुकीत प्रचारास सहभागी होणे गरजेचे आहे, अशी भावना दक्षिणच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे









