उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून २० कोटींचा निधी आणणार
सोलापूर … महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मधून विजयी झालेले नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या निवडीनिमित्त ‘हत्तुरे वस्ती’ येथे ‘कृतज्ञता मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. प्रभागाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून २० कोटी निधी आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक आप्पासाहेब हत्तुरे, शहराध्यक्ष संतोष पवार, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल मामा हत्तुरे, वैजिनाथ हत्तुरे, नूतन नगरसेवक वैभव हत्तुरे, जुबेर बागवान, सुरेखा काळे आणि सुकेशनी गंगोडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आप्पासाहेब हत्तुरे म्हणाले की, ” निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे ग्वाही दिली आहे. विकासाच्या जोरावर व जनसंपर्कामुळे वैभव हत्तुरे यांनी मातब्बर उमेदवाराचा पराभव केल्यामुळे दादांनी हत्तुरे यांचे अभिनंदन केला. त्यानुसार माॅडेल प्रभाग करण्यासाठी निधीची मागणी केली आहे. प्रभागापुरते मर्यादित न राहता, शहराच्या अन्य भागातही पक्ष वाढवण्याचे काम कार्यकर्त्यांनी जोमाने करावे. असे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले कि, “सोलापूर शहरात वैभव हत्तुरे यांनी विकासाच्या बळावर विजय मिळविल्याने हत्तुरे कुटुंबाच्या माध्यमातुन राष्ट्रवादीची प्रतिष्ठा राखली आहे. राजकारणात यश-अपयश येत असते, मात्र वैभव हत्तुरे यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी ताकद आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पवार यांनी सांगितले.
या कृतज्ञता सोहळ्याला प्रभागातील नागरिक, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानले व जनसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली.









