मंद्रूपचे उमेदवार रंगले गप्पांमध्ये
उमेदवार रस्सीखेच संपला, प्रचार सुरू
सोलापूर…
निवडणूक म्हटले की चार दिवसाचा खेळ. त्यामुळे यासाठी मैत्री, नाते व ऋणानुबंध जोपासण्याची गरज आहे. त्यामुळेच मंद्रूपचे भाजपा, काॅंग्रेस व शिवसेना या पक्षांचे उमेदवार योगायोगाने मोतीलाल राठोड यांना भेटण्यासाठी आल्यानंतर आधी दोस्ती, निवडणूकीच्या मग कुस्तीला महत्व दिल्याने निवडणूका खेळीमेळीत होणार असल्याची प्रचिती दिली.
मंद्रूप हे सर्वधर्मसमभाव मानणारा व सर्वसमावेशक गाव असल्याने प्रत्येकजण मैत्री व दोस्तीला महत्व देतो. मग तो कोणत्याही समाजाचा व पक्षाचा असला तरी मैत्रीमध्ये खंड पडत नाही. याची प्रचिती जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणूक सुरू झाल्यापासून दिसून येत आहे. शुक्रवारपासून प्रचार सुरू झाला असून उमेदवारांकडून गाठीभेठी व जनसंपर्क सुरू करण्यात आला आहे. मंद्रूपमध्ये आॅल इंडीया बंजारा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल राठोड हे सर्वसमावेशक व मितभाषी व्यक्तीमत्व असल्याने त्यांना भेटण्यासाठी उमेदवारांची रेलचेल सुरू झाली आहे. भाजपाचे प्रशांत कडते, काॅंग्रेसचे महमद शेख व शिवसेनेचे संतोष बरूरे यांच्यासह पंचायत समितीचे भाजपा उमेदवार मळसिध्द मुगळे यांनीही राठोड यांची भेट घेतली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, शिवाजी चव्हाण , सिध्दू सिंदखेडे व श्रीमंत पवार उपस्थित होते.
दक्षिण मधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाली आहेत. गुरूवार २२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यामुळे कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार ? ठरला आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांकडून शुक्रवार २३ जानेवारीपासून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे .
यावेळी पक्षाकडून इच्छुक असताना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या नाराज उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेणे व चाय पे चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी धडपड करीत आहे. दक्षिण मधील भाजपाकडील उमेदवारासाठी इच्छुकांची मोठी गर्दी असल्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार ? याकडे लक्ष लागले होते . मात्र या उमेदवारी निवडीत पक्षाकडून मोठ्या गावातील मतदारांकडे दुर्लक्ष करून उमेदवारी देण्यात आल्यामुळे उमेदवारांची प्रचारामध्ये दमछाक होताना दिसून येत आहे. त्यामुळे २७ जानेवारीला निवडणुकीचा अंतिम चित्र स्पष्ट होणार असला तरी २३ जानेवारीपासूनच उमेदवार चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. गर्दी असेल तिथे थांबणे, चौका चौकात गप्पा मारणे तसेच अक्का ,मामा, ताई, दादा म्हणत प्रत्येकाला आपल्यालाच मतदान करण्यासाठी विनंती करणे अशा गोष्टी सध्या दिसून येत आहेत.









